सुरक्षित आणि समृद्ध शिर्डीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू – डॉ. सुजय विखे पाटील

 

शिर्डी प्रतिनिधी, शिर्डीतील अलीकडच्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. शिर्डीतील माता-भगिनी सुरक्षित राहाव्यात आणि समृद्ध शिर्डी घडवण्यासाठी विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शासनाच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात केले.

यावेळी छत्रपती शासनाच्या वतीने दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना सात लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच शिर्डीतील ३०० स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना घरगुती आवश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. विखे पाटील परिवारानेही मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही कुटुंबांना अतिरिक्त सात लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले.

शिर्डीत शांतता आणि सुरक्षितता कायम राहावी यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांनी अनिष्ट प्रवृत्तींचा विरोध करण्याचा आणि समाजहिताचे निर्णय एकोप्याने घेण्याचा निर्धार व्यक्त केला. याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

शिर्डीच्या विकासासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी बस स्थानकासमोर “शिवसृष्टी” उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच, शिर्डी सुरक्षित राहावी आणि चुकीची कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

साईबाबा संस्थानच्या टोकन प्रणालीबद्दल समाधान व्यक्त करताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, या व्यवस्थेमुळे मंदिर परिसरातील गर्दी दररोज १०,००० लोकांनी कमी झाली आहे. मात्र, हे १०,००० लोक कोण होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. कोणीही अन्यायग्रस्त झाल्यास विखे पाटील परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. समाजहितासाठी सत्य बोलायचे असेल, तर त्यासाठी कोणताही विरोध पत्करण्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिर्डीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणाही करण्यात आली.