नगर तालुक्यातील दौऱ्यात आवाहन
अहमदनगर, ता. २ : राजकारणासाठी लोकांना झुलवत ठेवून थापेबाजी करणाऱ्यातील नागवडे कुटुंब नाही. स्वर्गिय दादापाटील शेळके यांच्यासोबत स्वर्गिय शिवाजीराव बापु नागवडे यांनी संस्काराचे व प्रामाणिकपणाचे राजकारण केले. ‘साकळाई’बाबत अनेकांनी तुम्हाला आश्वासने दिली, पण यावेळी आमच्यावर विश्वास टाका आम्ही साकळाईचे पाणी मिळवून देवू अशी ग्वाही राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी दिली.
अनुराधा नागवडे काही दिवसांपासून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या नगर तालुक्यातील गावांमध्ये जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. त्या भागातील दौऱ्यात बोलताना त्या म्हणाल्या, नागवडे कुटुंबाने कायमच संस्कारक्षम राजकारण केले आहे. बापुंनी कुटुंबासह कार्यकर्त्यांना दिलेले हे संस्कार तह्यात जपले जातील. केवळ सत्तेसाठी लोकांना शब्द देवून भुलथापा मारण्याचे उद्योग आम्ही कधीही केले नाहीत आणि करणारही नाही. जी कामे होतील त्याचेच आश्वासन देवून ती कामे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हेच आमचे ध्येय असते.
सरकार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या माध्यमातून ज्या नवीन योजना आल्या आहेत त्या लोकांच्या हिताच्या आहेत. अजित दादा हे असे नेते आहेत की दिलेला शब्द ते पाळतातच. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. त्यामुळे आम्हीही जे शब्द आपल्याला देवू त्याचे पालन करण्याचाच शंभर टक्के प्रयत्न होणार.
नागवडे म्हणाल्या, दादा पाटील शेळके व बापुंचे जिव्हाळ्याचे संबंध होते. वाळकी येथील साखर कारखाना व्हावा यासाठी या दोघांनी एकत्रीत प्रयत्न केले आणि या भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न साकार केले. ‘बापुं’नी राजकीय उद्देश समोर ठेवून काम केले नाही. त्यामुळे आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राजेंद्र नागवडे हेही नागवडे सहकारी साखर कारखान्याचे काम उत्तम रितीने चालवित आहेत.
नगर तालुक्यातील सध्या व यापूर्वीही काहींनी निधी दिल्याचा मोठा गवगवा केला. पण प्रत्यक्षात समस्यांचे डोंगर असल्याचा आरोप करीत त्या म्हणाल्या, अनेक गावामंध्ये मुलभुत समस्याही सुटलेल्या नाहीत. साकळाई उपसा जलसिंचन योजना ही या भागाला वरदान ठरणारी योजना व्हावी यासाठी जनआंदोलन सुरु आहे. त्याबाबत कुणी आश्वासने दिली, त्याचे काय झाले या खोलात आम्ही जाणार नाही. पण एकच सांगते एकदा नागवडे कुटुंबावर साकळाईसाठी विश्वास टाका तो विश्वास खराच करु.