‘तुतारी’साठी श्रीगोंदेकरांचा मुबंईत तळ , राहूल जगताप यांचेच पारडे जड

आघाडीची जागा पवार गटाकडेच राहणार…

संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. ११ : विधानसभा निवडणूकीत आपल्या हाती तुतारी आणि पाठीवर शरद पवार यांचा आशिर्वादाचा हात मिळावा यासाठी श्रीगोंद्यातील बहुतेक इच्छूक मुंबईत तळ ठोकून आहेत. इतर पक्षांचे नेते श्रीगोंद्यातून उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या गटाकडे गळ घालत असले तरी समजलेल्या माहितीनूसार माजी आमदार राहूल जगताप यांचेच पारडे जड असल्याचे समजते. तथापि आज दिवसभर होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा करिश्मा मोठा असल्याचे पुन्हा सिध्द झाले. खासदार नीलेश लंके यांना मतदारसंघातून ज्या पध्दतीने आपुलकी मिळाली त्यानंतर विधानसभेलाही पवार यांचीच जादू चालणार हे सिध्द झाले. या सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे झुकते माप मिळत आहे. माजी आमदार राहूल जगताप यांचे नाव त्यासाठी सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे.
दरम्यान महायुतीची उमेदवारी भाजपाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या घरात जाणार हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) इच्छूक अनुराधा नागवडे यांनी शरद पवार गटाकडे प्रयत्न सुरु केले आहेत. नागवडे व जगताप हे दोघे कालपासून मुबंईत तळ ठोकून आहेत. काल रात्री जगताप यांची पवार व जयंत पाटील यांच्याशी भेट झाली. आज सकाळी नागवडे समर्थक पवार यांची भेट घेणार असल्याचे समजते. शिवसेनेचे साजन पाचपुते हेही मुंबईत असून तेही उमेदवारी मागत आहेत. पण समजलेल्या माहितीनूसार, श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीच लढणार आहे.