आता…..नागवडे यांना लढावेच लागणार

अनुराधा नागवडे यांच्या झंझावाताने वातावरण तापले…

संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. ६ : तब्बल ७५ वर्षे वांगदरी येथील नागवडे कुटुंब राजकारण, समाजकारण आणि सहकाराच्या माध्यमातून लोकांच्या सानिध्यात आहे. शिवाजीराव बापु नागवडे यांच्या नंतर आता त्यांचे दोन्ही पुत्र राजेंद्र व दीपक नागवडे यांच्यासह सुष्ना अनुराधा नागवडे यांनी कार्यकर्त्यांची जुळलेली नाळ कायम ठेवून बापुंचे राजकीय संस्कार जोपासले आहेत. पण आता त्यांचा हा संघर्ष निर्णायक वळणावर आला असून, यंदाची विधानसभा नागवडे कुटुंबाला लढावीच लागणार असून पक्ष नाही तर अपक्ष अशी भूमिका ठेवून त्यांची तयारी सुरु आहे.
शिवाजीराव नागवडे हे राज्याच्या राजकारणात खुप मोठे वलय असणारे नाव आहे. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात विकासाचे जाळे विणले. त्यासोबतच घोड, कुकडी या धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बजावली. राज्यातील सर्वच जेष्ठ नेत्यांसोबत काम करताना त्यांनी श्रीगोंद्यातील प्रश्नांचा आढावा घेत तालुक्यात विकास पर्व राबवले. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी परिसराचा केलेला विकास कुणीही विसरु शकत नाही. आता त्यांची पुढची पिढी हा वारसा समर्थपणे सांभाळत आहे.
गेल्या विधानसभा निवडणूकीत नागवडे कुटुंब थांबले. पण यावेळी मात्र त्यांनी अगोदरच तयारी सुरु केली आहे. एक वर्षांपासून राजेंद्र नागवडे यांनी राज्यात आणि अनुराधा नागवडे यांनी मतदारसंघात लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्यासोबत दीपक नागवडे यांनीही दुसरी बाजू सांभाळताना यावेळी नागवडे पुन्हा आमदार दिसतील असे नियोजन चालविले आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात नागवडे कुटुंब हे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विचाराशी जुळलेले आहे. मध्यंतरीच्या घडामोडीत नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण तरीही थोरात यांच्यासह इंदापुरचे माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत असणारे राजकारणापलिकडचे सबंध कायम ठेवले. आता महायुतीत श्रीगोंद्याची जागा भाजपाच्या वाट्याला आहे. ती घड्याळाकडे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. पण त्यापुर्वीच अनुराधा नागवडे यांनी मतदारसंघात झंझावात सुरु केला आहे. गावोगावी जात लोकांच्या व विशेषकरुन महिलांच्या समस्या जाणून घेवून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मतदारसंघात नागवडे कुटुंबातील महिला आपल्या घरापर्यंत येते आणि समस्या जाणून घेते ही अनेकांसाठी मोठी गोष्ट आहे. महिला असतानाही अनुराधा नागवडे ज्या पध्दतीने मतदारसंघात फिरत आहेत त्यावरुन आता त्या थांबणार नाहीत हेच समोरे येते.
महायुतीची उमेदवारी जरी मिळाली नाही तरी नागवडे यांना या निवडणूकीत थांबता येणार नाही याची जाणीव त्यांच्या कुटुंबासह कार्यकर्त्यांनाही असल्याने सगळ्या पातळीवरचा संघर्ष आणि तयारी त्यांनी चालवली आहे. काहीच कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याने नागवडे थांबणार नाहीत हे जसे पुढे येते तसेच त्यांना आता लढावेच लागेल हेही तितकेच महत्वाच आहे.