शिवसेनचे उपनेते साजन पाचपुते यांचा दावा
संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. २१ : आगामी विधानसभा निवडणूकीत श्रीगोंदा मतदार संघातून महाविकास आघाडीचा उमेदवार हा शिवसेना (ठाकरे गट) असेल. मुंबईसह श्रीगोंद्यात येवून नेत्यांनी तसा शब्द लोकांना दिला आहे. माझा पक्षावर पुर्ण विश्वास असून विधानसभेला आपल्याच हाती महाविकास आघाडीची मशाल असेल असा दावा शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांनी केला.
आज माजी आमदार राहूल जगताप यांनी बारामती येथे जावून कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन करीत विधानसभेला उमेदवारीचा शब्द मिळविला. त्या पार्श्वभुमिवर बोलताना साजन पाचपुते म्हणाले, राजकारणात घरी आलेल्या नेत्याला नाराज करता येत नाही. जगताप व ‘पवार साहेब’यांच्यात काय चर्चा झाली याची मला माहिती नाही. पण सोशल मिडीयातील बातम्यांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत त्यांना शब्द दिल्याची चर्चा आहे. त्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचे नाही.
शब्द आणि उमेदवारीही आपलीच- साजन पाचपुते
आपण शिवसेना विरोधी बाकांवर बसलेली असताना पक्षात प्रवेश केला. आमचे नेते उध्दव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी त्यावेळी ज्या पध्दतीने माझ्यासारख्या तरुणाचे स्वागत केले, त्यावरुन आम्ही सगळेच भावूक झालो होतो. वडील गेल्यावर आधार कोण देणार, हा प्रश्न असतानाच गाव माझ्यासोबत उभे राहिलेच आणि ठाकरे कुटुंब,संजय राऊत यांनी माझ्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला.
उध्दव ठाकरे हे आमचे सर्वस्व आहे. त्यांनी मातोश्रीवर लोकांच्या साक्षीने आपल्याला ‘विधानसभेची तयारी कर’ असा शब्द दिलेला आहे. शिवाय आमचे नेते संजय राऊत व आदित्य ठाकरे श्रीगोंद्यात आल्यावर दोघांनीही येथील तरुणांचे संघटन पाहून ‘श्रीगोंद्यात यावेळी साजनच्या रुपाने मशाल पेटणार व तोच आमदार म्हणून विधानसभेत जाणार’ असे जाहीर केले आहे. त्यामुळे आपण बिनधास्त आहोत. माझ्या नेत्यांचा शब्द म्हणजे अंतीम आहे. श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार हा साजन सदाशिव पाचपुते हाच असेल.
आपल्या वडीलांनी मतदारसंघात, कार्यकर्त्यांमध्ये जो त्याग केला तो सर्वांना माहिती आहे. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी लोकांचा व पक्षाचा मला पुर्ण पाठींबा आहे.
२०१४ ला सगळे सोबत म्हणून जगताप आमदार झाले….
२०१४ मध्ये राहूल जगताप यांच्यासोबत तालुक्यातील पाचपुते यांचे सगळे विरोधक नेते होते. यात शिवाजीराव नागवडे, प्रा. तुकाराम दरेकर, अण्णासाहेब शेलार, घनशान शेलार,बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रेय पानसरे या प्रमुख्यांचा समावेश होता. आज यातील त्यांच्यासोबत कोण आहे ? हे सगळे नेते जगताप यांच्या विरोधात आहेत याची जाणीव सगळ्यांना आहे.
२०१९ ला जगताप का थांबले ? साजन पाचपुते यांचा सवाल…
२०१४ ला जगताप आमदार झाले, पण लगेच २०१९ ला ते का थांबले याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. कुकडी कारखान्याची अडचण असल्याने ते थांबल्याचे सांगितले जाते. पण आज ते लढणार आहेत तर कारखान्याची स्थिती चांगली आहे का ? निव्वळ शेतकऱ्यांचे १४ कोटी रुपये देणी आहेत. ऊस तोडणी मजूर, वहातुकदार यांचे पेमेंट वेगळेच आहे. २०१९ पेक्षा आज कारखान्याची अवस्था वाईट असताना ते कशाचे आधारे विधानसभा करण्याची भाषा करतात. मतदारसंघातील लोक या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहेत असेही साजन पाचपुते म्हणाले.