खासदार नीलेश लंके यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना साकडे
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध आगारांकडे असलेल्या एसटी बसेसच्या संख्येत मोठी घट झाली असून, अनेक बसेस जुन्या झाल्याने रस्त्यामध्ये बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, नगर जिल्ह्यातील सर्व आगारांना नव्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
मंत्री सरनाईक यांना पाठविलेल्या निवेदनात खासदार लंके यांनी नमूद केले आहे की, एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी विविध सवलती लागू केल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात फक्त सुमारे ६०० बसेस कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांत बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, जुन्या बसेस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, अनेक बसेस स्क्रॅप केल्या गेल्यामुळे बससेवा आणखी कमकुवत झाली आहे.
इतर आगारांनाही बसेस मिळाव्यात
राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नव्या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, नगर जिल्ह्यातील केवळ तारकपूर आगाराला १० आणि संगमनेर आगाराला ९ अशा एकूण १९ बसेस मिळाल्या आहेत. इतर आगारांना मात्र नव्या बसेस मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आगारांना नव्या बसेस तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांचे हाल
बसेसची संख्या अपुरी असल्याने ग्रामीण भागातील बससेवा विस्कळीत झाली आहे. विशेषतः खेड्यापाड्यातून शहरी भागात शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नव्या बसेस उपलब्ध करून, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल टाळावेत, अशी विनंती खासदार लंके यांनी परिवहन मंत्र्यांना केली आहे.