श्रीगोंद्यात फटाके, मुबंईत ट्रायडंटवर स्नेहभोजन

महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरुन पोरखेळ


संजय आ. काटे


श्रीगोंदा, ता. ८ : सोमवारी रात्री शहरातील शनी चौकात अचानक फटाक्यांच्या आतषबाजी सुरु झाली. चर्चा होती की, राहूल जगताप यांची आघाडीच्या उमेदवारी फायनल झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्याचवेळी मुंबईच्या नरीमन पाँईंटला असणाऱ्या ट्रायडंट या अलिशान हाॅटेलमध्ये महाविकास आघाडीच्याच तिकीटासाठी प्रयत्नशिल असणाऱ्या एका कुटुंबाने जयंत पाटील यांच्यासोबत स्नेहभोजन घेत, आघाडीच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. त्यातच आज पन्हा दुपारी शनीचौक फटाक्याचा आवाज आणि गुलालाच्या उधळण झाली. चौकशी केली असता समजले की, आता साजन पाचपुते यांची आघाडीकडून उमेदवारी फायनल झाल्याने ही आतषबाजी करण्यात आली.
विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने उमेदवारी करु इच्छिणाऱ्या नेते फिल्डींग भक्कम करण्यासाठी डावपेच टाकत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप हे एकमेव तगडे नेते इच्छुक आहेत. त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाकडून उपनेते साजन पाचपुते आणि काँग्रेसकडून घनश्याम शेलार हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. या व्यतिरिक्त महाविकास आघाडीतून अनेक जणांनी प्रयत्न चालवले असले तरी, यापूर्वी आघाडीत असलेले हेच उमेदवार प्रबळ समजले जातात.
खासदार निलेश लंके यांचे पाठबळ राहुल जगताप यांच्या सोबत दिसत असल्याने जगताप यांची बाजू वरचढ ठरते. त्यातच गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, ‘तुमच्या मनातीलच उमेदवार मिळेल, काळजी करू नका’ असा संदेश दिला आहे. त्यापूर्वी खुद्द शरद पवार यांनी जगताप यांना, ‘कामाला लागा’ असा संदेश दिल्याने त्यांची उमेदवारी फायनल असल्याचे कार्यकर्ते गृहीत धरून आहेत.
काल सोमवारी पुणे येथे शरद पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर रात्री कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा शहरातील शनी चौक येथे फटाक्यांची मोठी आतषबाजी पाहायला मिळाली. राहुल जगताप यांची उमेदवारी फायनल झाल्याची चर्चा करीत हा जल्लोष होता. खरचं उमेदवारी फायनल झाली का विरोधक राहिला नाही त्यामुळे हा जल्लोष झाला, हे जरी बाजूला ठेवले तरी जगताप यांच्या कार्यकर्त्यांचा उताविळपणा यातून पुढे आला. याचा अर्थ यांना इतर दोन सहकारी पक्षांची गरज नाही असाही होतो. आता जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीचे राजकारण गरजेच असले तरी ते होत नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.
दरम्यान श्रीगोंद्यात फटाक्यांच्या आतषबाजी सुरू असतानाच मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये दोन पक्षांच्या नातेवाईकांमध्ये मेजवानी सुरू होती. गोड घास घेतानाच उमेदवारी कशी मिळवायची आणि निवडणूक कशी लढवायची याची खमंग चर्चा चालू होती. त्यासाठी डावपेच कसे टाकायचे, कुणाबरोबर बैठक करायची, किती वाजता भेटायचे हे ठरत असताना या मेजवानीत काही उद्योगपती समाविष्ट असल्याचे समजते. याच नेत्यांची उद्या सकाळी पुण्यात बैठक होणार असल्याचे समजते.
म्हणजे एकीकडे फटाक्यांची आतषबाजी राहुल जगताप यांचे कार्यकर्ते करीत असतानाच, त्यांचे विरोधक मुंबईत त्यांची उमेदवारी कट करण्याचे कारस्थान करीत होते.
याच दरम्यान आज दुपारी पुन्हा एकदा श्रीगोंद्याच्या त्याच शनी चौकात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण झाली. चौकशी केली असता, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांना महाविकास आघाडीची उमेदवारी फायनल झाली म्हणून हाल जल्लोष असल्याचे सांगण्यात आले. रात्रीच्या फटाक्यांचा आवाज शमण्याच्या आधीच आज दुपारी वेगळ्या गटातर्फे फटाकडे वाजवल्याने लोकांची करमणूक झाली, असे म्हणतानाच सुज्ञ लोकांनी या दोन्ही नेत्यांना वेगवेगळ्या भाषेत मनातल्या मनात सुनावलेही असेल. उमेदवारी मिळाल्यानंतर जो काय जल्लोष आहे तो केला तर ती वेगळी गोष्ट आहे. परंतु अशा पद्धतीने शह कटशह होत असेल तर महाविकास आघाडीमध्ये अजिबात अलबेल नाही हेच यातून पुढे येते. राहुल जगताप यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी मोठी यंत्र राबवत असतानाच अशा प्रकारे महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचे वागणे त्यांच्या निष्ठावंतांना रुचेल का हा प्रश्न आहे.