शरद पवारांना अगोदर नाकारणारे नेते आता तुतारी मिळविण्यासाठी पवारांच्या दारात
संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. ३ : जेष्ठनेते शरद पवार यांची राजकीय ताकत राज्याला माहिती आहे. पण हीच ताकत २०१९ च्या विधानसभेला न कळणाऱ्या श्रीगोंद्याच्या नेत्यांना या निवडणूकीत मात्र ती समजली आहे. त्यावेळी पवारांची उमेदवारी नाकारणाऱ्या काही नेत्यांनी आता तुतारी मिळावी म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत.
शरद पवार अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च पातळीवर आहेत. सत्ता असो अथवा नसो, राजकारण हे त्यांच्याच भोवती खेळते हे त्यांचे विरोधकही नाकारत नाहीत. राज्याच्या चर्चेत कसे राह्याचे हे त्यांनाच माहिती आहे. पण या तेल लावलेल्या पैलवानाची राजकीय किंमत २०१९ ला श्रीगोंद्यातील नेत्यांना दुर्लक्षित केली होती.
श्रीगोंद्यात २०१४ ला राजकीय भुकंप झाला. माजीमंत्री व तत्कालिन आमदार बबनराव पाचपुते यांचा धक्कादायक पराभव करीत राष्ट्रवादीचे जायंट किलर ठरलेले राहूल जगताप तरुण आमदार झाले. त्यावेळी पाचपुते यांनी पवार यांची साथ सोडत भाजपाचा हात पकडला होता. राष्ट्रवादी सोडताना थोरल्या व धाकट्या पवारांवर टोकाची टिका व आरोप केले होते. त्यावेळी पाचपुते यांना पराभुत करण्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच जाळे टाकले होते. श्रीगोंद्यातील सर्व पाचपुते विरोधकांना एकत्र करीत राहूल जगताप हा नवखा चेहरा पुढे आणला. यांनी सुक्ष्म रणनितीच्या जोरावर बबनराव पाचपुते यांना पराभुत करण्याची किमया साधली होती.
गेल्यावेळी विधानसभा निवडणूकीत पवारांच्या घड्याळाची उमेदवारी घ्यावी म्हणून त्या पक्षाचे नेते अक्षरश: काहींच्या घरी बसून होते. पण ‘आम्हाला विधानसभा लढायचीच नाही’, या भुमिकेवर ठाम राहत निवडणूकीला म्हणजेच अप्रत्यक्षपणे आमदार बबनराव पाचपुते यांना बाय देणारे हेच नेते आता मात्र पवारांच्या तुतारीसाठी काहीही करायला तयार असल्याचे दिसते.
२०१९ ला विधानसभा निवडणूक लागली आणि राजकीय गणित बदलली. आमदार असतानाही राहूल जगताप यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यास व नंतर निवडणूकच लढणार नाही असे सांगत थेट वर हात केले. एकाच टर्ममध्ये जगताप यांची ही भूमिका का बदलली यावर बराच खल झाला. पवार यांच्यासाठी ही धक्कादायक बाब होती. कारण भाजपाला राज्यात धूळ चारण्यासाठी विद्यमान आमदाराची उमेदवारी महत्वाची असते, पण जगताप यांनी थांबण्याचा निर्णय घेतला.
त्याचवेळी पवार यांच्या टिमने अनुराधा नागवडे हे अस्त्र बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. जेष्ठ नेते व राज्य साखर संघाचे अध्यक्ष राहिलेल्या शिवाजीराव बापु नागवडे यांच्या त्या सुष्ना असल्याने समाजात त्यांच्याविषयी मोठी आपुलकी होती. पाचपुते यांना पुन्हा एकदा पराभुत करुन श्रीगोंद्यातही पवारच किंग आहेत हे दाखविण्यासाठी पवार गटाचा मोठा प्रयत्न सुरु होता.
राष्ट्रवादीचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे उमेदवारीचे तिकीट घेवून अगोदर श्रीगोंदा साखर कारखाना व नंतर थेट नागवडे यांच्या घरी गेले. त्यावेळी घटनाक्रमात फाळके हे माध्यमांना ‘नागवडे हेच आमचे उमेदवार’ असे थेट सांगत होते. काही पत्रकारांनी त्यांना ‘हे होणार नाही’ असे सांगण्याचा प्रयत्नही केला पण ते म्हणाले, ‘थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल’. पण त्याकाळी थोड्या वेळात ‘घड्याळा’चे काटे उलटे फिरले आणि नागवडे यांनीही पवार यांच्या प्रस्तावाला किंमत न देता उमेदवारी नाकारली. त्याकाळी अजून काही नेत्यांना विचारणा झाली पण कुणीही पवारांची सोबत करायला पुढे आले नाही.
घनशाम शेलार यांनी ही संधी असल्याचे मानत हाती उमेदवारीचे घड्याळ बांधले. कोणीच तयार नसल्याने चालून उमेदवारी आल्याचे त्यांना लक्षात होते. निवडणूक सुरु झाली आणि विजयाची फारशी संधी नाही, असे वाटल्याने शेलार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक फार ‘सिरियस’ घेतली नाही. शरद पवार यांची सभा झाल्यावर पाचपुते यांच्याविरोधातील सुप्त लाट व पवार यांना मिळणारी सहानुभुती जाणकारांच्या लक्षात आली, पण उमेदवार असणाऱ्या शेलार यांना ती लक्षात आली नाही अथवा त्यांना जाणवली नाही. निवडणूक निकाल लागला आणि पाचपुते यांनी शेलार यांचा केवळ ४ हजार ७५० एवढ्या निसटत्या मताधिक्याने ( शेलार यांच्याकडे अजून २४०० मते असते तर निकाल फिरला असता) पराभव केला. त्याहीवेळी पवार यांची जादू चालली होती, पण पाचपुते यांच्या प्रचारात असणाऱ्या सदाअण्णा पाचपुते यांच्या सगळे लक्षात आल्याने शेवटच्या रात्री त्यांनी यंत्रणा फिरवली आणि निसटणारा विजय आवाक्यात आणला होता.
हा सगळा गेल्या विधानसभेचा इतिहास आहे. याहीवेळी घड्याळाचे (अजितदादांच्या ) काटे उलटेच फिरत असतानाच, तुतारी हातात घ्यायला बहुतेक इच्छूक प्रयत्नशिल आहेत. यावेळी पवार साहेबांचा वरदहस्तच हवा अशी भुमिका घेवून माजी आमदार राहूल जगताप तुतारीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी ‘त्यांना नको, आमच्यापैकी कोणालाही द्या’ अशी विनंती साहेबांकडे करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
गेल्यावेळी विधानसभा नको असे म्हणणारे नागवडे कुटुंब यावेळी घड्याळ, अपक्ष कसेही लढण्याच्या तयारीत आहेत. तेही ‘साहेबां’च्या संपर्कात ‘व्हाया इंदापुर’ असल्याचे बोलले जाते. अर्थात ते खरे आहे की नुसती चर्चा याचे उत्तर लवकरच मिळेल. कारण गेल्यावेळी राष्ट्रवादीला नाकारुन थेट भाजपात प्रेवश करुन पाचपुते यांच्या विजयात वाटा उचलणाऱ्या राजेंद्र नागवडे हे धुर्त राजकारणी आहेत. ‘बापुं’चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी ते यंदा सगळे पर्याय खुले ठेवून मैदानात उतरत आहेत.
गेल्यावेळी पराभुत झालेले घनशाम शेलार हे ही जागा काँग्रेसला सोडा अशी मागणी करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे जात आहेत (खरे कारण गुदस्त्यात). त्याचवेळी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे काम पाहणारे जेष्ठ नेते बाबासाहेब भोस हेही ‘मीही निवडणूक लढू शकतो’ असे बोलत आहेत. पण भोस ज्यांच्या नेतृत्वात तालुक्यात काम करतात, ते नागवडे निवडणूक लढविणार असताना भोस हे धाडस कसे करतात हाही प्रश्न अनेकांना आहे.मी ‘साहेबां’च्या सोबत असून पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहिन असेही ते सांगत आहेत (पण त्यामुळे आतुन नागवडे यांच्यासाठी भोस प्रयत्नशिल आहेत की काय अशी शंका येते). त्यातच मध्यंतरी नागवडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी भोस यांच्याही खांद्यावर घड्याळाच्या राष्ट्रवादीचा ‘पंचा’ होता हे सुज्ञ लोक विसरलेले नाहीत.
शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, सर्व पक्षात वावरणारे अण्णासाहेब शेलार हेही निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याने त्यांनाही ‘साहेबां’चा हात डोक्यावर हवा आहे. त्यामुळे ते वेगळ्या मु्द्यावर राजकारण करीत आहेत. एकुणच काय गेल्यावेळी पवारांची पाॅवर न ओळखणाऱ्या श्रीगोंद्यातील नेत्यांना आता पवारच हवे आहेत हेच पुढे येतेय.