श्रीगोंद्याच्या राजकारणात दीपक नागवडेंची एन्ट्री

उमेदवारीबाबत चाचपणी


संजय आ. काटे


श्रीगोंदा,ता. ४ : श्रीगोंद्यातून आघाडीचा उमेदवार अजूनही निश्चित मानला जात नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘कामाला लागा’ हा माजी आमदार राहूल जगताप यांना दिलेल्या आदेशाचा उद्देश नेमका काय होता याचे गणित उलगडत नाही. ‘श्रीगोंद्यातून तुतारी फुंकताय का’? अशी थेट विचारणा दीपक शिवाजीराव नागवडे यांना झाल्याने तालुक्याच्या राजकारणात भुकंप होणार की काय अशी दाट शक्यता वाढली आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या शरद पवार या एकाच नावाची चलती आहे. सत्तेतील, विरोधातील आणि महाविकास आघाडीचे सगळेच नेते साहेबांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपुर्वी अजित पवार बाहेर पडले आणि साहेब संपले अशी सुरु झालेली चर्चा काही दिवसात नुसतीच संपली नाही तर आता ती उलट दिशेनेही फिरु लागली आहे.

शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणाचा ताबा पुन्हा मिळविला असून आज माजीमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली आहे. दौंडमधून अप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे हे चर्चेत असतानाच अजित पवार यांचे विश्वासू रमेश थोरात यांच्याबद्दलही वेगळी चर्चा आहे.


शरद पवार यांचे नगर जिल्ह्यावर बारकाईने लक्ष आहे. श्रीगोंद्यातून माजी आमदार राहूल जगताप यांच्या ताब्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदत मिळवून दिली. तसे जगताप यांनी जाहीर सभेत सांगितले आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर शिक्कामोर्तबही केले.

त्याचवेळी जगताप यांचे शिष्टमंडळ बारामती येथे शरद पवार यांना भेटल्यावर त्यांनी ‘कामाला लागा’ असा आदेश दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जगताप हेच महाविकास आघाडीचे उमेदवार या चर्चेने जोर धरला.


पण आता श्रीगोंद्याच्या राजकारणात नव्याने समि‍करणे तयार होत असल्याची चाहूल आहे. दिवंगत नेते शिवाजीराव बापु यांचे धाकटे पुत्र दीपक नागवडे यांनीही याबाबत चाचपणी सुरु केली आहे. त्यावर दीपक नागवडे यांनी स्पष्ट सांगितले नसले तरी मिळालेल्या माहितीनूसार, पवार व त्यांची भेटही झाली आहे.

ही बाब राहूल जगताप यांच्याही कानी गेली आहे. त्यामुळे दीपक नागवडे यांची तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री होतेय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.


दीपक नागवडे यांनी बापुंसाठी १९९९ च्या विधानसभा निवडणूकीत जीवाचे रान केले होते. या तरुणाने त्यावेळी बापुंचा विजय साकरताना तालुक्यात नव्या पर्वाची सुरुवात केली होती. पण नंतर त्यांनी राजकारण बाजूला ठेवून अध्यात्माची कास धरली. तरीही ज्यावेळी कुटुंबाला अथवा पक्षाला गरज लागेल त्यावेळी त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.

विजयादशमी पुर्वीच निर्णय अपेक्षीत…
दीपक नागवडे तुतारीचा प्रस्ताव स्विकारणार की नाकारणार याचा फैसला दसऱ्यापुर्वीच होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात काय हालचाल होतेय याची उत्सुकता लागली आहे.