श्रीगोंदा न्यायालयाचा निकाल
कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील ताराबाई काशिनाथ चंदन (वय ७२ ) यांच्या खून प्रकरणातील आरोपी मयूर संजय भागवत (वय २५) रा. शिवाजीनगर अहिल्यानगर याला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी भारतीय दंड विधानसभेचा कलम ३०२ अन्वये दोषी ठरवित त्याला जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदरचे खटल्याचे काम अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे (गायके ) यांनी पाहिले .
घटनेची थोडक्यात अशी, की आरोपी मयूर संजय भागवत हा फिर्यादी खंडू काशिनाथ चंदन रा. कुंभार गल्ली,कोळगाव यांच्याकडे मूर्ती कारागीर म्हणून वर्ष २०१७-१८ पासून काम करत होता.सदर मूर्तीचा कारखाना हा फिर्यादी यांच्या घरा नजीकच असल्याने सदर मूर्ती कारखाना शेजारी असलेल्या रूममध्येच राहत होता.
दिनांक ३० मार्च २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी हा कारखाना येथे कामास आला त्यावेळी मयत ताराबाई यांनी आरोपीकडे, ‘तू कामावर उशिरा का आला’ अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्या वादा दरम्यान आरोपी वृद्ध महिला ताराबाई यांना तुम्हाला बघून घेईन असे दम देऊन तू राहत असलेल्या रूममध्ये निघून गेला.
त्याच दिवशी मयत ताराबाई व तिचे पती हे कारखान्यामध्ये झोपले असताना रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मयत ताराबाईचा ओरडण्याचा आवाज आल्याने तिचा मुलगा व सून यांनी त्यांचे घरातून कारखान्यात येऊन पाहिले असता ताराबाई रक्तबंबाळ होऊन खाली पडलेली होती. तिचे शेजारी आरोपी मयूर भागवत हातातील रक्ताने माखलेला चाकू घेऊन उभा होता. त्या दोघांना पाहताच, हातातील चाकू टाकून आरोपी हा पळून गेला . त्यावेळी जखमी ताराबाई यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे दाखल करताना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०७ खुनाचा प्रयत्न केल्याबाबत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान त्याचवेळी आकाश चंदन व गौरव पुरी यांनी आरोपीचा कोळगाव बस स्टॅन्ड येथे शोध घेतला असता तो मिळून आला. त्यास घेऊन ती पुन्हा आरोपीस घटना ठिकाणी घेऊन आले. सदर बाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. सदर आरोपीस चालक पोलिस हेड काँन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे व नंदकुमार पठारे यांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.
दरम्यानच्या काळात जखमी महिला ताराबाई हिचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२ अन्वये वाढ करण्यात आली.
सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनात तत्कालीन बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चाटे लेखनिक हवालदार भांडवलकर रामदास, कैलास शिपणकर, चालक सोनवणे भाऊसाहेब शिंदे, पो. काँ. नंदकुमार पठारे, विनोद पवार, सतीश शिंदे, संदीप दिवटे यांनी केला.
सदर खटला दरम्यान पैरवी अधिकारी सुजाता गायकवाड यांनी सहाय्य केले.