श्रीगोंद्यात राहूल जगताप यांच्याविरोधात विरोधकांनी पेटवली ‘मशाल’…..

वरचढ जगताप यांना रोखण्यासाठी नवा डाव


संजय आ. काटे

श्रीगोंदा, ता. १३ : आमदार बबनराव पाचपुते यांना रोखण्यासाठी नव्हे तर माजी आमदार राहूल जगताप यांनाच रोखण्यासाठी स्वकीय आणि काही विरोधकांची एकी सध्या कार्यरत आहे. जगताप यांची लोकसभा निवडणूकीतील निष्ठा त्यांची कामी येत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्यावर खुश दिसतात. त्यामुळे त्यांना तुतारी मिळू शकते हे लक्षात आल्याने, आता जगताप यांच्या अंतर्गत विरोधकांनी मोट बांधली आहे. शिवेसेनेच्या ‘मशाली’चा त्यासाठी आधार घेतल्याची माहिती आहे. श्रीगोंद्याची जागाच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) यांना सोडण्यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डींग लागली आहे.
श्रीगोंद्यात विधानसभा निवडणूक फिवर कमालीचा वाढला आहे. महायुतीची उमेदवारी भाजपाचे नेते व जेष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबात जाणार हे निश्चित मानले जाते. त्यामुळे विधानसभा लढण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या अनुराधा नागवडे यांची अडचण झाल्याचे दिसते. परिणामी त्यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांनी उमेदवारीला मोर्चा महाविकास आघाडीकडे वळविला आहे.
दोन दिवसांपुर्वी मुंबईत राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, दीपक नागवडे यांच्यासह शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांनी शरद पवार यांची भेट घेतली. हे सगळेच नेते राहूल जगताप यांचे सध्या तरी विरोधक मानले जातात. त्या बैठकीत काय झाले याची निश्चित माहिती नसली तरी जगताप यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आल्याचे समजते. शिवाय श्रीगोंद्याची जागा ठाकरे गटाला सोडण्यासाठी मागणीही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भोस हे पवार गटाकडे, नागवडे हे अजित पवार गटाकडे आहेत तरीही त्यांच्या साक्षीने साजन पाचपुते यांनी या जागेवर मशाल पेटविण्याची मागणी करणे म्हणजे या सगळ्या नेत्यांचा अप्रत्यक्षपणे जगताप यांना असणारा विरोध आहे हे स्पष्ट होते.
दरम्यान जगताप यांचा कुकडी कारखाना अडचणीत आहे. त्यांच्याकडे शेतकऱ्यांची थकीत देणी आहेत हा मुद्दा विरोधक उचलून धरीत आहेत. पण प्रत्यक्ष मतदारसंघात मात्र काय आहे हे ते शोधत नाहीत असे स्पष्ट मत पवार गटाच्या एका नेत्याने नोंदविल्याचे समजते. जगताप यांना विरोध करण्यासाठी हे नेते मुंबईत तळ ठोकून बसले असतानाच येथे मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घ्यायला या नेत्यांना लक्षच राहिले नाही.

सेनेचे खासदार जेष्ठनेते संजय राऊत यांच्या माध्यमातून साजन पाचपुते श्रीगोंद्यात मशाल पेटविण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणूकीत या दोघांच्याच अट्टाहासाने सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटील यांना ऐनवेळी सेनेची मशाल दिली आणि काँग्रेसचा विरोध पत्करला. सांगलीचा निकाल काय लागला तर सेनेचे चंद्रहार पाटील यांची अनामत जप्त झाली. ही नामुष्की आल्याने महाविकास आघाडीत संघर्षही झाला. आता पुन्हा राऊत श्रीगोंद्यात मशाल देण्यासाठी आघाडीवर दबाव टाकल असल्याची चर्चा आहे. हे सगळे राहूल जगताप यांना विरोध म्हणून सुरु आहे की, नागवडे यांना निवडणूक लढविण्यास सोपे जावे यासाठी आहे हे थोड्याच दिवसात समजेल. पण या सगळ्यात आमदार पाचपुते यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्यासाठी महाविकास आघाडीतील काही नेते प्रयत्नशिल असल्याचेच दिसते.

डाव-प्रतिडाव….

एकीकडे जगताप यांना उमेदवारी मिळू नये यासाठी काही नेते प्रयत्नशिल असतानाच, मशाल साजन यांच्या हाती देवून बबनराव पाचपुते यांच्या मतात विभागणी करायची आणि नागवडे यांना अपक्ष उभे करुन त्यांना जिंकण्यासाठी मदत करण्याचा डाव टाकला जात आहे. पण या नेत्यांना लक्षात नाही काँग्रेसचे घनशाम शेलार हे सर्वात जास्त लोकसंपर्कात असणारे नेते आहेत. ते अपक्ष राहिले तर काय होईल… शिवाय जगताप हेही थांबतील हे कसे गृहित धरले जाते. या सगळ्यात दुसरा प्रतिडाव म्हणजे शरद पवार यांच्याकडून इतर नेत्यांना काही तरी साध्य करायचे आहे. एकास एक उमेदवारी द्या असे सूचवून आमच्या पदरी इतर सत्तेचे माप टाका हा प्रतिडावही सुरु आहे.

नागवडे नेमके कोणत्या पक्षात ?
अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांनी मध्यंतरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेथून उमेदवारी मागत दोन दिवसांपर्यंत घड्याळाचे चिन्हे असणारे पत्रके वाटली जात होती. पण अचानक शरद पवार यांच्या भेटीची सत्र सुरु झाले आणि त्यात नागवडे हेही उपस्थितीत होते. आता शरद पवार महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रीत बैठक घेणार असून त्यासाठी नागवडे यांचाच पुढाकार असल्याचे समजते. पण त्यामुळे नागवडे नेमक्या कोणत्या पक्षात आहेत याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.