उमेदवारी मागणाऱ्या वारसदारांचे स्वकतृत्व काय – भोस

सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांचे शरद पवार यांना पत्र


संजय आ. काटे

श्रीगोंदा, ता. ८ : आपण गेली दहा वर्षे लोकांच्या सुख-दु:खात आहोत. सामान्यांच्या प्रश्नांसाठी थेट रस्त्यावर संघर्ष करतोय. लोक आपल्यासोबत आहेत. याउलट वडीलांच्या आश्रयाचे कवच पांघरुन श्रीगोंद्याचे आमदार होण्यासाठी निघालेल्या सगळ्याच वारसदारांचे स्वकतृत्व काय आहे हे एकदा तपासा आणि मगच निर्णय करा असे आवाहन सामाजीक कार्यकर्ते टिळक भोस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केले आहे.
भोस म्हणाले, काल (सोमवारी) पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) इच्छूकांच्या मुलाखती झाल्या. यात श्रीगोंद्यातून अनेकांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. मीही या पक्षाकडून श्रीगोंद्यातून इच्छूक आहे. मला तेथे बोलण्याची संधी मिळाली. याशिवाय शरद पवार यांना तीन पानी पत्रही दिले आहे.
भोस म्हणाले, मला जी बोलण्याची संधी मिळाली त्यात श्रीगोंदा मतदारसंघाचे प्रश्न मांडतानाच त्यासाठी केलेला संघर्षाचा अहवाल दिला. उमेदवारी देताना पैसा, संस्था हे निकष लावण्यापेक्षा जिंकणारा व सामान्यांसाठी कामे करणारा, प्रशासन माहिती असणारा उमेदवार द्यावा असा आपला आग्रह राहिला. जे महाविकास आघाडीकडून विधानसभा लढविण्यासाठी इच्छूक आहेत त्यातील राहूल जगताप हे त्यांचे वडील कुंडलिकराव तात्या जगताप यांचे वारसदार म्हणून उमेदवारी मागत आहेत. त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात काय कामे केली अथवा नंतर काय संघर्ष केला हे सांगावे. कुकडी कारखान्यातून शेतकऱ्यांचा काय दिले याचेही गणित मांडावे. त्यांच्यासोबतच नागवडे कुटुंब तर सगळेच लढायचा निघालेत. शिवाजीराव बापु नागवडे यांचे पुत्र अथवा सुन एवढाच निकष त्यांचा आहे. त्यांनी स्वकतृत्वावर त्यांचे खाजगी कारखाने बाहेरच्या जिल्ह्यात घेतले पण मतदारसंघातील लोकांसाठी त्यांचे योगदान काय याचा विचार नेत्यांनी करायला हवा.
शिवसेना (उबाठा) यांच्याकडून उमेदवारी मागणारे साजन पाचपुते हेही त्यांचे वडील सदाशिवअण्णा पाचपुते यांनी केलेल्या कामाच्या जीवावरच उमेदवारी मागत आहेत. त्यांचेही स्वकतृ्त्व काय आहे हे त्यांनी एकदा जाहीर करायला हवे. एवढेच नव्हे तर विरोधी भाजपाकडून उमेदवारी मागणाऱ्या विक्रमसिंह पाचपुते यांनीही त्यांचे वडील आमदार बबनराव पाचपुते यांचा सरकारी निधी एवढाच निकष आहे. त्यांनी तालुक्यातील कोणत्या प्रश्नांसाठी संघर्ष केला अथवा तालुक्यात प्रकल्प आणला याचे उत्तर द्यावे असेही टिळक भोस म्हणाले.
आपण उमेदवारी मागितली आहे. महाविकास आघाडीच्या जिंकणाऱ्या उमेदवाराच्या यादीत आपणच बसत असून सामान्यांसाठी संघर्षाची तयारी फक्त आपलीच असल्याने नेते त्याचा विचार करतील असा दावाही भोस यांनी केला.