विधानसभेला भाजपाला होणार फायदा
संजय आ. काटे
Shrigonda Political Newsश्रीगोंदा, ता. १ : दहा वर्षांपुर्वी नागवडे व जगताप यांचा गट एकत्र आला आणि आमदार बबनराव पाचपुते यांचा विधानसभेत पराभव झाला. त्यावेळी एकी केलेले नेते आता राहिले नसल्याने नागवडे व जगताप यांच्यातील ‘दादां’ना परफेक्ट सल्लागार भेटल्याने दोन्ही गटांचा वाद नुसता विकोपालाच गेला नाही तर त्याचा कधीही भडका होण्याचा धोका आहे.
जेष्ठ दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप व प्रा. तुकाराम दरेकर यांच्यासह सध्या राजकारणात सक्रीय असणाऱ्या अनेकांनी २०१४ मध्ये पाचपुते विरोधकांची मोट बांधली होती. त्यावेळी राहूल जगताप यांना आमदार करण्यात पाचपुते विरोधकांच्या मतांची न झालेली विभागणी सर्वात मोठी बाजू होती. ही एकी काही काळ तशीच राहिली पण गेल्या पाच वर्षात ती तुटली आहे.
आता राजेंद्र नागवडे व राहूल जगताप हे श्रीगोंद्याच्या राजकारणातील दोन दादा एकत्र येणार नाहीत याची खबरदारी त्यांच्याच जवळचे काही जण पध्दतशीरपणे घेत आहेत. या दोघांमधील वाद वाढावा यासाठी खतपाणी घातले जात असतानाच या दोघांनाही त्यांच्या राजकारणाचा अजूनही खरा अंदाज आलेला नाही असे मत जाणकारांचे आहे.
या दोन्ही गटांचा दही हंडीचा कार्यक्रम नुकताच झाला. अर्थात दोघांपेक्षा शिवसेनेचे साजन पाचपुते यांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला गर्दी जास्त होतीच शिवाय त्यांचे नियोजनही दोघांच्या तुलनेत सफाईदार होते. पण कुणाची दहीहंडी चांगली झाली ही चर्चा रंगण्याऐवजी नागवडे व जगताप गटातील कार्यकर्त्यांच्या कुरघोड्या मात्र सध्या चर्चेत आहेत.
जगताप यांच्या कार्यक्रमात नागवडे समर्थकांनी अनुराधा नागवडे यांचे पोस्टर झळकावले. त्यावरुन रण पेटले आहे. त्यापुर्वी नागवडे यांच्या कार्यक्रमात राडा करण्यासाठी जगताप समर्थकांनी काही जणांना दारु पाजल्याचा आरोप होत आहे. त्यावरुन सध्या दोन्ही गटांत तणावाचे वातावरण असून त्याचा स्फोट होवू शकतो अशी भिती आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी हे दोन गट एकमेकांना प्रतिस्पर्धी समजत आहेत. पण भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांची बाजू सध्या खुप वरचढ झाली आहे. विक्रमसिंह पाचपुते, डाॅ.प्रतिभा पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. संपर्कात ते सध्या सर्वात पुढे असून त्यांची चर्चाही चांगली आहे. काँग्रेसचे घनशाम शेलार, सेनेचे साजन पाचपुते, भाजपाच्या सुवर्णा पाचपुते, अण्णासाहेब शेलार, यांचीही मतदारसंघात सकारात्मक चर्चा आहे. त्यामुळे विधानसभेला उमेदवार कोण असेल व त्यात बाजी कोण मारणार याचे गणित अजून बरेच लांब असतानाच नागवडे-जगताप यांच्यातील राजकीय गोंधळ भाजपाच्या पथ्यावर पडत आहे हे मात्र खरे आहे.